स्वागतकक्ष

परिसर व पर्यावरण प्रकल्प स्पर्धा – २०२३

साधारणत: इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात पुणे शहराचा उल्लेख आढळतो. या शहराची पूर्वीची अनेक नावे इतिहासात आढळतात. जसे की पुन्नाटा, पुनवडी, पुण्य याचेच नंतर पुणे अशी उत्पत्ती झाली असावी असा तर्क मांडला जातो.

अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करुन सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्वज्ञान गाथेतील अभंगाच्या माध्यमातून सांगणाऱ्या संत तुकारामांची पुणे जिल्हा हीच जन्मभूमी व कर्मभूमी होती.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. शिवाजीच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहीले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे होय. म्हणूनच पुणे तेथे काय उणे अशी म्हण प्रचलित झाली आहे.

पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. बाजीराव पेशव्यांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवार वाडा ही भव्य किल्लासदृश्य वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र नाना साहेब पेशवे यांच्या काळात पुणे हे हिंदूस्थानचे सत्ताकेंद्र बनले. त्यांनी पुण्याच्या सुशोभिकरणाकडे लक्ष दिले. पर्वती देवस्थान, सारसबागेची निर्मिती केली. हौद, वाडे, मंदिरे, रस्ते इत्यादींचा विकास केला.

सन १८१८ मध्ये मराठेशाहीचा व पेशवाईचा अस्त झाला व पुढील काळात १८१८ मध्ये शनिवार वाड्यामध्ये इंग्लंडचा युनियन जॅक फडकविला गेला. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुण्याच्या शनिवारवाड्यावरील युनियन जॅक काढून तेथे भारताचा तिरंगा ध्वज फडकविण्यात आला.